#CoronaVirus: “…तर संपूर्ण राज्य आणि देश एका आठवड्यासाठी अंधारात जाईल”; राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली भीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे देशात आलेला अंध:कार घालवण्यासाठी रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता अनेकांनी एकाच वेळी लाईट्स बंद केल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन विजपुरवठा संपूर्ण राज्यच अंधारात जाईल अशी भीती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी सर्वांना घरातील लाईट्स बंद करुन दारामध्ये किंवा बाल्कनीत दिवे अथवा बॅटरी अथवा मेणबत्ती अथवा मोबाईल प्लॅश लाइट लावून हा करोनाचा अंध:कार पळवून लावूयात असं आवाहन केलं आहे. मात्र असं केल्यास तांत्रिक अडचण निर्माण होईल अशी भीती महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे. “सर्व लाइट्स एकाच वेळी बंद केले तर त्यामुळे विजपुरवठा करणारा इलेक्ट्रीक ग्रीड निकामी होऊ शकतो. सर्व अत्यावश्यक सेवा कोलमडून पडतील. ग्रीड फेल्युअर झाल्यास पुन्हा लाईट येण्यास आठवडाभराला वेळ लागू शकतो. त्यामुळे मी लोकांना आवाहन करतो की दिवे आणि मेणबत्त्या लावा मात्र लाईट्स बंद करु नका,” असं राऊत म्हणाले आहेत.