मिसेस इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत कोमल साळुंखे यांना महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचा किताब
- तर राष्ट्रीय पातळीवर आठव्या क्रमांकाचा किताब
पिंपरी – भोसरीतील शाहु शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया – शी इज इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय पातळीवर आठव्या क्रमांकाचा किताब पटकाविला.
देशस्तरावर फॅशन इंडस्ट्रीजमध्ये सोळा वर्षांचा अनुभव असणा-या डॅमसाई कंपनीने ’डॅमसाई मिसेस युनिव्हर्स मिसेस अर्थ’ अंतर्गत ‘मिसेस इंडिया – शी इज इंडिया’ ही स्पर्धा दिल्लीत हॉटेल द उमराव येथे आयोजित केली होती. तीन दिवस झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी 14 जुलैच्या मध्यरात्री संपन्न झाली. या स्पर्धेत विवाहीत महिलांमध्ये असणा-या कलागुणांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. या वर्षीच्या स्पर्धेचा ‘घरगुती हिंसा’ (डोमेस्टिक वायलेन्स) हा विषय होता. यातील अंतिम फेरीत देशभरातून पंच्चेचाळीस महिलांची निवड झाली होती.
कोमल साळुंखे या महाराष्ट्र विभागातून प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर आठव्या किताबाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेच्या एका फेरीमध्ये त्यांनी राजामाता जिजाऊ यांच्या वेषात महाराष्ट्राची तलवार बाजी सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आज सर्वच क्षेत्रात सक्षमपणे ताठ मानेने उभ्या राहु शकत आहेत, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून सिने अभिनेत्री संगीता बिजलानी, आदिती गोवित्रीकर, सिने अभिनेता कुणाल कपूर (रंगदे बसंती चित्रपट फेम), अष्का गोरडिआ, डॅमसाई मिसेस युनिव्हर्स कंपनीच्या सीईओ रीचा सिंग, मिसेस युनिव्हर्स २०१७ च्या विजेत्या लक्ष्मी शेषाद्री, मिसेस इंडिया २०१७ च्या विजेत्या श्वेता आठवाल, ग्रृमींग ट्रेनर अवनी शहा, रीटा गंगवानी यांनी काम पाहिले.
सुत्रसंचालन सिने अभिनेता अमन वर्मा यांनी केले. या स्पर्धेत कोमल साळुंखे यांच्या ड्रेस डिझायनर म्हणून रंजना धोपेश्वरकर यांनी काम पाहिले तर मिथील वैद्य यांनी फोटो व व्हिडीओग्राफर म्हणून काम केले. लक्ष्मी शेषाद्री यांच्या हस्ते क्राऊन आणि सिने अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या हस्ते कोमल साळुंखे यांना टायटल प्रदान करुन गौरव करण्यात आला.
महिलांना स्वावलंबी बनविण्यात पुढाकार
कोमल साळुंखे या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या आहेत. त्या पुण्यासह महाराष्ट्रभर वसुंधरा वुमेन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योग व शिक्षण क्षेत्रात महिला सबलीकरणासाठी काम करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी तीन हजारहून जास्त महिलांना उद्योग, व्यवसायासाठी मोफत मार्गदर्शन शिबिर घेऊन स्वावलंबी केले आहे. तसेच, ओॲसिस फॅशन डिझाईन इन्स्टिट्युटच्या संचालिका म्हणून त्या काम पाहत आहेत. भोसरी, इंद्रायणीनगर येथील शाहु शिक्षण संस्थेच्या राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो युवती महिला कायद्याच्या पदवीधर झाल्या आहेत.