आधार कार्डाचा डाटा गुप्तच राखणार – रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली – आधार कार्डाद्वारे लोकांची व्यक्तीगत माहिती जी सरकारकडे जमा झाली आहे त्याचे गांभीर्याने सरकार संरक्षण करीत आहे अशी ग्वाही दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की या संबंधात सरकारने न्या बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती नेमली असून त्या समितीच्या अहवालाची सरकारला प्रतिक्षा आहे. ते म्हणाले की आधार कार्डाच्या माहितीची गुप्तता कायम ठेवण्यासाठी सरकारला कायद्याचेही पाठबळ आहे. आधार कार्डाच्या व्यवस्थेबददल जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताचे कौतुक केले आहे.
भारत हा आज डिजीटल पॉवर म्हणून उदयाला येत आहे. याच वातावरणात आम्हाला लोकांच्या प्रायव्हसीचीही काळजी आहे. फेसबुक आणि केम्ब्रीज ऍनालॅटिका या कंपन्यांनी भारतीय नागरीकांचा डाटा चोरून वापरला होता त्या प्रकरणातही सरकारने त्यांच्यावर नोटीसा जारी केल्या होत्या. त्याबद्दल संबंधीत कंपन्यांनी माफीही मागीतली आहे असेही प्रसाद यांनी निदर्शनाला आणून दिले.
देशातील बॅंक खाती आधारला जोडण्याची प्रकियाही मोठ्या प्रमाणात झाली आहे असे सांगून ते म्हणाले की सध्य 60 कोटी 22 लाख खाती आधारला जोडली गेली आहेत. तसेच देशातील 121 कोटी 65 लाख लोकांना आधार कार्ड दिले गेले आहे.