हकालपट्टीच्या शक्यतेने विराटने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले; सुनील गावसकर यांचा गौप्यस्फोट
मुंबई | प्रतिनिधी
कसोटी क्रिकेटवरील विराट कोहलीचे प्रेम जगजाहीर आहे. भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा तो आतापर्यंतचा सर्वात जास्त चांगली कामगिरी करणारा कर्णधार आहे. संघ बांधणीत त्याचे मोठे योगदान आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी गमावल्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्याच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही. पराभवानंतर कदाचित त्याला पदावरून दूर केले गेले असते. म्हणून त्याने हे पद सोडले असावे, असा खळबळजनक दावा भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. त्यानंतर १५ जानेवारीला विराट कोहलीने कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद आपण सोडले असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर शनिवारी त्याने ही माहिती दिली. त्याचे मला आश्चर्य वाटले नाही. कारण संघाच्या पराभवानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो ही घोषणा करू शकला असता. मात्र रागाच्या भरात हा निर्णय घेतला, असा आरोप झाला असता म्हणून त्याने नंतर हा निर्णय जाहीर केला. यापूर्वी विराटची वन-डे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हाच बीसीसीआय आणि विराट यांच्यातील मतभेद उघड झाले होते. त्यामुळे विराट कोहलीने कसोटीतील पराभवानंतर स्वतः कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यात बीसीसीआयचा काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुली यांनी दिली आहे. मात्र विराटच्या राजीनाम्याचे मला असे वाटत नाही, असे गावसकर यांनी म्हटले आहे.