महाविकासआघाडीत पुन्हा नाराजीनाट्य; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना फोन
मुंबई | महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचा दावा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र दर काही दिवसांनी अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येणे, ही आता नित्याची बाब झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला निर्णयप्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यातील भेटीनंतर ही नाराजी दूर झाल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक चव्हाण यांच्या खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव त्यांच्याशी चर्चा न करताच तयार करण्यात आला. मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याने अशोक चव्हाण नाराज झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही नाराजी बोलून दाखवल्याचे समजते. त्यामुळे आता हे नाराजीनाट्य किती लांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.