आपत्कालीन परिस्थितीत सरकार आस्तित्वहीन- देवेंद्र फडणवीस
आपत्कालीन परिस्थिती हाताळणीतील सरकारचे अपयश चक्रीवादळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. मदतीची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असताना सरकार नुसत्याच घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे भीषण चक्रीवादळाच्या या परिस्थितीत सरकारचे आस्तित्वच कुठे दिसत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मंडणगड तालुक्यासह दापोली तालुक्यातील चक्रीवादळग्रस्त भागाची फडणवीस यांनी आज पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ऊटंबर, केळशी,आंजर्ले, पाजपंढरी आदी गावांना भेट देत फडणवीस यांनी वादळग्रस्तांची मदत कार्याच्या अनुषंगाने विचारपूस केली आहे.
सुरक्षित निवारा नाही, शेती उत्पन्नाचे साधन संपले, वीज नाही, पाणी नाही अशा परिस्थितीत सरकारने वादळग्रस्तांना तातडीची मदत देणे अपेक्षित होते. पण दहा दिवसांत अद्याप कोणताही निधी येथपर्यंत पोचलेला नाही, असे सांगतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांना बँकांकडून दीर्घ मुदतीची कर्ज देऊन त्याचे व्याज सरकारमार्फत भरण्याचा विचार केला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोल्हापूरातील पूरपरिस्थितीत ज्याप्रमाणे चाकोरीबाहेर जाऊन निर्णय घेतले गेले, त्याचप्रमाणे येथेही शेतकऱ्यांना मदत झाल्यास शेतीचे नुकसान भरून येण्यास काही अंशी मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वादळानंतरच्या परिस्थितीत घरांवरील पत्र्यांची टंचाई निर्माण झाली. ते येथील व्यापाऱ्यांनी जादा दराने विकले. वीज पुरवठा अद्याप खंडीत आहे. परिस्थितीची पूर्वकल्पना असूनही सरकारने कोणतीच पूर्वतयारी केली नाही, हेच यातून सिद्ध होते. भाजपने पक्षस्तरावर तातडीने पत्रे, कौल, अन्नधान्य मोफत उपलब्ध करून वादळग्रस्तांचे दु:ख काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, विनय नातू, प्रसाद लाड, केदार साठे, भाऊ इदाते आदींसह अनेक भाजपनेते उपस्थित होते.