‘मुनगंटीवार के हसीन सपने’ पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहीन : राऊत
मुंबई | रामलल्ला यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष तर पूर्ण करेलच शिवाय पुढील १५ वर्षे सत्ता कायम राखण्यातही यशस्वी ठरेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राऊतांनी टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून भाजपचे नेते दररोज नवनवीन विधाने करत आहेत. यात सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर असल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ‘मुंगेरीलाल के सपने’ सारखे ‘मुनगंटीवार के सपने’ असं पुस्तक पाच वर्षानंतर प्रसिध्द करु असा टोला लगावला होता. याचा दाखला देत राऊतांनी या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिणार असल्याचे सांगितले.