माझ्या प्रश्नांना घाबरू नका, राहुल गांधींची अर्थमंत्र्यांवर टीका
नवी दिल्ली | केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस नेते राहुल गांधी सोडत नाहीत. वेगवेगळ्या माध्यमातून ते सत्ताधाऱ्यांवर टीका करीत असतात. यावेळी राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रश्नांना घाबरू नका. मी देशातील युवकातर्फे हे प्रश्न विचारतो आहे. त्यांना उत्तर देणे तुमची जबाबदारी आहे.
राहुल गांधी म्हणाले, देशातील युवकांना रोजगार हवा आहे. पण तुमचे सरकार युवकांना रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मी देशातील युवकातर्फेच हे प्रश्न विचारतो आहे. त्यांना उत्तर देणे ही तुमची जबाबदारीच आहे. त्यामुळेच माझ्या प्रश्नांना घाबरू नका.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एका हिंदी वृत्तपत्रातील बातमीही जोडली आहे. याच बातमीतील आशयाच्या आधारावर त्यांनी हे ट्विट केले आहे. किती रोजगारनिर्मिती होणार याचे आकडे अर्थसंकल्पात का दिले नाही, यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, जर मी आकडा सांगितला एक कोटी. तर राहुल गांधी काही दिवसांनी प्रश्न विचारणार एक कोटी रोजगाराचे काय झाले. त्यामुळेच मी कोणताही आकडा दिला नाही, असे सीतारामन यांनी या वृत्तपत्राला सांगितले.