ऐन सणासुदीत नऱ्हेतील ५० कुटुंबे अंधारात?
ऐन सणासुदीत नऱ्हेतील ५० कुटुंबे अंधारात?
बंद मीटरची बाकी तब्बल साडेआठ लाख : महावितरण अधिकाऱ्यांची चालढकल
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
महावितरणची बाकी थकवून बिल्डरने पोबारा केल्याने फ्लॅट धारकांना किमान साडे आठ लाख रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबत महावितरणचे अधिकारी देखील उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ऐन सणासुदीत या तब्बल ५० फ्लॅटधारकांना अंधारात राहावे लागण्याची शक्यता आहे.
सन २०१५ साली नऱ्हे गावातील एका इमारतीचे काम सुरू झाले. त्यावेळी महावितरणने बांधकामासाठी लागणारा मीटर वितरीत केला. मात्र, इमारतीचे काम सुरू असताना तब्बल दीड वर्ष सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या मात्र, विकासकाकडून सुमारे दोन महिन्याचे वीजबिल थकाविल्या गेले. त्यानंतर सदर इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतलेल्या नागरिकांनी त्या बिलाची भरपाई केली. व त्याचवेळी बांधकामाचे मीटर काढून घरगुती मीटर लावण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ५० फ्लॅट पैकी केवळ १० मीटर लावून दिले. त्यानंतर देखील बांधकाम मीटर सुरूच ठेवले.
दिवाळखोर झाल्याने विकासक पळून गेला. त्यानंतर सन २०१९ साली पुन्हा सुमारे दीड लाखांच्या आसपास वीज बील येथील नागरिकांनी वर्गणीद्वारे भरले. मात्र, त्यानंतर आलेले बील भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर महावितरणने मीटर काढून नेला. सन २०१९च्या सुधारीत शासन निर्णयानुसार बांधकाम व व्यवसायिक मीटर यांच्यातील मीटरभाडे फरक देखील आकारून तब्बल ८ लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी चढविण्यात आली.
याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत चालढकल करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे. तीन महिन्यापासून फॉलोअप घेणाऱ्या भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी पोलीसांनी हस्तक्षेप करून आंदोलक व अधिकाऱ्यांना एकाच मंचावर आणले.
यावेळी भूपेंद्र मोरे म्हणाले, ऐन सणासुदीच्या दिवसात या नागरिकांना अंधारात राहावे लागणार आहे. या विषयावर सातत्याने फॉलोअप करून देखील अधिकारी नुसत्याच तांत्रिक बाबी पुढे करत आहेत. यामुळे दोष नसताना देखील या फ्लॅटधारकांना विजेसाठी अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागत आहेत.
येत्या १० नोव्हेंबरपर्यंत या संदर्भात मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक प्रयत्न करत आहोत. आम्हाला देखील नियमानुसारच काम करावे लागते. : मनोजकुमार सूर्यवंशी, अपिलीय अधिकारी, पर्वती महावितरण केंद्र, सिंहगड रोड.