महाराष्ट्रात दररोज ‘इतक्या’ हजार मुलांचा होतो जन्म
मुंबई : राज्यात वर्षाला १७.४७ लाख मुले व दिवसाला ४ हजार ८०० मुले जन्माला येतात. या सर्व नवजात शिशूंचे पूर्णपणे लसीकरण करण्याची व्यवस्था शासनाकडे असल्याचे आरोग्य सचिव नवीन सोना यांनी सांगितले आहे. पुढील ५ वर्षात १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून शासन युनिसेफच्या मदतीने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१९-२१ या कोरोना काळात जगभरातील जवळ-जवळ साडे सहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफने अहवालात नमूद केले आहे. अत्यावश्यक लसीकरणाअभावी अनेक मुलांना गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भारताची लसीकरणातील कामगिरी सर्वोत्तम आहे. तरी देखील राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचून त्याचे लसीकरण करण्यासाठी युनिसेफ महाराष्ट्राने राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.