राज ठाकरेंच्या सल्ल्यावर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले,..
आमदारकी-खासदारकी काही नवे चेहरे आले पाहिजेत
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सल्ला दिला होता. राज ठाकरे यांनी अजित पवारांना बाहेर लक्ष देता तसं आपल्या काकांकडेही लक्ष द्यावं, असा खोचक टोला लगावला होता. आता यावर अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार म्हणाले की, ठीक आहे. राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं, तसं मीही माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन, असा प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवारांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं होतं. यावर अजित पवार म्हणाले की, शरद पवारांनी गेल्या ५५-६० वर्षांच्या राजकीय जीवनात काही प्रसंग लक्षात घेऊन अनेकदा भाकरी फिरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नवे लोक पुढे आले आहेत, हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही चाळीशीत असताना शरद पवारांनी मला, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी दिली. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आम्ही आमचं काम दाखवू शकलो. जसं सगळ्यांना वाटतं की मला प्रमोशन मिळावं तसं नव्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. माझीही तीच इच्छा आहे की, आमदारकी-खासदारकी काही नवे चेहरे आले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं म्हटलं होतं. यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अमोल कोल्हेंच्या म्हणण्याला शुभेच्छा..असं एका वाक्यात उत्तर दिलं आहे.