मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा: संभाजी ब्रिगेड
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्यावी.

पिंपरी : मराठवाड्यात यावर्षी जून महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून अल्प पावसाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात पेरणी केली मात्र पेरणीनंतर गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक भागांतील पिके सुकून चालली आहेत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे,खते, औषधे तसेच पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे मात्र पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीची राज्य शासन आणि केंद्र शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे मराठवाड्यातील सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलासा म्हणून प्रति एकर १ लाख रुपये तातडीची आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे उपाध्यक्ष गणेश देवराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा – ‘सनदशीर मागण्या कशा मान्य करायच्या?’; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर गिरीश महाजनांचा सवाल
तसेच पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा, दुष्काळी सवलती आणि शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ त्वरित मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशा संकटाच्या काळात केवळ घोषणा न करता शासनाने प्रत्यक्ष आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना एकरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे काळे यांनी केली आहे.





