विद्यार्थ्यांवर पॅलेट गन कोणी चालवली? राहुल गांधी आक्रमक, पोलीस ठाण्यात ठिय्या

नवी दिल्ली | नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला. मात्र, या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी २० जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यावेळी काही विद्यार्थी जखमी देखील झाले होते.
तसेच यावेळी पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गन्सचा वापर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी आणि विरोधकांनी केला होता. मात्र, हे आरोप सरकार आणि पोलिसांकडून फेटाळून लावण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गन्सचा वापर करण्यात आल्याच्या प्रकरणात राहुल गांधी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गन कोणी चालवली? या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही? असे अनेक सवाल उपस्थित करत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राहुल गांधी हे पीडित विद्यार्थ्यांसह दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेर आपण ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.
हेही वाचा
‘महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ला सेलिब्रेटी, तरुणाई, सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
“विद्यार्थी साहिलवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी आज मी दिल्लीतील संसद मार्ग येथील डीसीपी कार्यालयात आलो आहे. २० जुलै रोजी जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या साहिलवर पोलिसांनी ‘पेलेट गन’ने हल्ला केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शांततापूर्ण आंदोलनावर केलेली अशी क्रूरता केवळ बेकायदेशीरच नाही, तर तो एक गंभीर गुन्हा आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तसंच पंतप्रधानांनी देखील माफी मागितली नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“आता जेव्हा साहिल न्यायासाठी एफआयआर दाखल करू इच्छित आहे. तेव्हा त्याला एफआयआर दाखल करू दिलं जात नाही. अशा प्रकारे संविधान आणि घटनात्मक अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. अमित शाहाजी तुम्हाला न्यायाची एवढी भीती का वाटते? ही भीतीच हे दर्शवत आहे की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत आहात. एफआयआर दाखल होईलच. न्यायालयीन चौकशी होईल आणि या क्रूरतेसाठी दोषी असलेल्या प्रत्येकावर, वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत कारवाई होईल. आम्ही साहिलला आणि त्याच्यासारख्या प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळवून देऊ”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.





