एक महिन्याचा वारी प्रवास पूर्ण.. माऊलींची पालखी आळंदीत दाखल; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात परतीचा सोहळा आळंदीत विसवला

आळंदी : आषाढी वारी सोहळा पूर्ण करून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदी नगरीत दाखल झाला. तब्बल महिनाभराचा पायी प्रवास, लाखो वारकऱ्यांची साथ, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमलेला वारीचा प्रवास आज माऊलींच्या आळंदीच्या समाधी मंदिरात विसावला.
आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याने विविध मुक्काम आणि टप्पे पार करत आषाढी एकादशीला पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गाने विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करत… पौर्णिमेला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत. परतीचा प्रवास सुरू झाला. पंढरपूरहून पुन्हा आळंदीच्या दिशेने निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते.
हेही वाचा – पुढील दोन दिवस राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा मोठा इशारा
महिनाभराच्या या भक्तिमय प्रवासात ऊन, पाऊस, चिखल आणि विविध अडचणींची पर्वा न करता वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि भगव्या पताकांनी सजलेला वारीचा मार्ग पुन्हा एकदा भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
आता माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन झाल्याने आषाढी वारीच्या या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासाची सांगता झाली आहे. महिनाभराचा खडतर प्रवास पूर्ण करून माऊली पुन्हा आपल्या आळंदीत दाखल झाल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





