आकिब नबीची भारताच्या कसोटी संघात निवड! BCCI ची अधिकृत घोषणा

Aquib Nabi | देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीच्या कामगिरीचे अखेर चीज झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात आकिब नबीची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी आकिबचा संघात समावेश करण्यात आल्याची अधिकृत घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे.
जसप्रीत बुमराहच्या डाव्या गुडघ्याची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्यामुळे बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे बुमराहला श्रीलंका दौऱ्यातून ऐनवेळी माघार घ्यावी लागली. बुमराहच्या अनुपस्थितीत कोणाला संधी मिळणार, यावर विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, निवडकर्त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकणाऱ्या आकिब नबीच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्याला भारतीय संघात पाचारण केले आहे.
𝗡𝗘𝗪𝗦:
Auqib Nabi replaces Jasprit Bumrah in India’s Test squad.
Details 🔽 #TeamIndia | #SLvIND https://t.co/lAf25FbpDN
— BCCI (@BCCI) August 3, 2026
हेही वाचा
सिस्पे इन्फिनिटी घोटाळा: मुख्य आरोपी राहुल काळोखे फिजीतून अटकेत; २१ हजार गुंतवणूकदारांना दिलासा
रणजी करंडकातील धमाकेदार कामगिरीची पावती
क्रिकेट वर्तुळात ‘बारामुल्ला एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकिब नबीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या दोन रणजी करंडक हंगामांत मिळून त्याने एकूण १०४ बळी टिपण्याचा पराक्रम केला असून, यात केवळ २०२५-२६ च्या मोसमातील तब्बल ६० बळींचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरला त्यांच्या पहिल्यावहिल्या रणजी करंडक जेतेपदापर्यंत पोहोचवण्यात त्याने ऐतिहासिक आणि अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय, नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात ‘इंडिया ए’ संघाकडून खेळताना त्याने दोन प्रथम श्रेणी सामन्यांत ६ बळी मिळवून आपल्या प्रभावी कामगिरीची चुणूक दाखवून दिली होती.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेवेळी डावलले गेल्यामुळे माजी खेळाडूंनी निवड समितीवर टीका केली होती. मात्र, आता श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेआधी मिळालेल्या या संधीमुळे आकिबला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुधारित भारतीय संघ:
भारतीय कसोटी संघ: शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी.





