Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधी देणार’; मंत्री उदय सामंत

पुणे : मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी मराठी भाषा विभागामार्फत भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच या ऐतिहासिक संमेलनाचे महत्त्व लक्षात घेऊन जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत ते पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यातील साहित्य संमेलनांचेही याच धर्तीवर नियोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन तसेच समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाची शंभर वर्षांची परंपरा ही मराठी समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीची साक्ष आहे. अनेक साहित्यिक, कवी, लेखक आणि ग्रामीण भागातील साहित्यसेवकांनी मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. यापूर्वी नवी दिल्ली आणि सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आगामी काळात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने परदेशात आयोजित होणाऱ्या १२ साहित्य संमेलनांसह युवा साहित्य संमेलन, ९९ वे साहित्य संमेलन आणि मराठी भाषा विभागाच्या दालनासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान महत्त्वपूर्ण’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

ते पुढे म्हणाले की, नवी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनात ग्रामीण साहित्याचे प्रभावी दर्शन घडले. त्यामुळे आगामी संमेलनात शहरी साहित्याबरोबरच ग्रामीण भागातील साहित्यिकांनाही प्राधान्याने स्थान मिळाले पाहिजे. विश्व मराठी संमेलनात बोलीभाषांवरील परिसंवाद आयोजित केले जात असले, तरी या बोलीभाषा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे शब्दकोश तयार होणे आवश्यक आहे. मराठी साहित्य संमेलने ही भाषेच्या सन्मानाची आणि सांस्कृतिक जतनाची महत्त्वाची व्यासपीठे असून बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व साहित्यप्रेमींचा त्यात सहभाग असावा. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने हे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावर्षीपासून भारतीय तसेच जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ‘अनुवाद समिती’ स्थापन करून त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ‘अभिजात सप्ताह’ निमित्त राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये ‘माझी मराठी, अभिजात मराठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बळकटीकरणासाठी राज्य मराठी विकास संस्थेमार्फत एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाच्या आयोजनासह विविध विषयांवर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून, मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाकडून पुढेही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती महामंडळ यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी मराठी भाषेची व्यापक चळवळ उभी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. देशभरातील बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी तसेच जागतिक स्तरावरील साहित्य संमेलनांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button