धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? CJP-सरकारच्या बैठकीत ‘२४ तासां’चा अल्टीमेटम!

नवी दिल्ली | केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे. या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज कॉक्रोच जनता पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत येत्या २४ तासांत धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, अन्यथा देशभर आंदोलन होतील, असा इशारा दिला. तर, सरकारनेही या विषयावर निर्णय घेण्याकरता २४ तासांची मुदत मागितली आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या महिन्याभरापासून केली जातेय. २० जुलै रोजी आयोजित केलेल्या संसद मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सीजेपीने दिला आहे. दरम्यान, संसद मोर्चावरील लाठीचार्जनंतर अमित शाहांच्या निवासस्थानी पहिली बैठक झाली. तर, आज कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये दुसरी बैठक झाली.
सुमारे दोन तासांच्या बैठकीनंतर, सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितलं की, सरकारने दोन मागण्या मान्य केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थींच्या कुटुंबांना भरपाई देणे आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करणे, या मागण्या मान्य करण्यात आल्याचं रांका यांनी स्पष्ट केलं. रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आमच्या मागणीवर सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार त्यांना लवकरच पदावरून हटवेल अशी आम्हाला आशा आहे.”
हेही वाचा

ते पुढे म्हणाले, “आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थींच्या कुटुंबांना भरपाई देणे आणि विद्यार्थ्यांवरील एफआयआर व कायदेशीर खटले मागे घेणे, या दोन मागण्यांना सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे.” सीजेपी नेते आणि सरकार यांच्यातील बैठकीची तिसरी फेरी शनिवारी होणार आहे. या बैठकीसाठी सरकारने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांची नियुक्ती केली आहे.
जे. पी. नड्डा काय म्हणाले?
दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आंदोलकांशी चर्चा करण्याकरता येथे आलो होतो. २ तास चर्चा चालली. सरकारच्या वतीने मी आणि जितेंद्र सिंगही उपस्थित होते. त्यांचं म्हणणं आम्ही जाणून घेतलं आहे. अत्यंत सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. त्यांनी मांडलेल्या विषयावर सर्वतऱ्हेने चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही पुन्हा उद्या दुपारनंतर भेटणार आहोत. तेव्हा घेतलेला निर्णय जाहीर केला जाईल.”





