अमित शाहांचे नियोजन, नड्डांची मध्यस्थी अन् सोनम वांगचुक यांची संमती… ; वाचा उपोषण संपवण्यामागची कहाणी

Sonam Wangchuk : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर २६ दिवसांनंतर आपले उपोषण संपवले आहे. त्यांच्या आणि केंद्र सरकारमधील चर्चेने सोनम वांगचुक यांच्या उपोषण संपवण्याच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात जवळपास चार तास उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यात वांगचुक यांच्या मागण्या आणि त्यांच्या आरोग्यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत, सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या आरोग्याला व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचेही ठरवले.
गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नीशी फोनवर संवाद साधला. वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार गांभीर्याने विचार करत असून त्यावर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीदरम्यान, त्यांनी वांगचुक यांना आमरण उपोषण संपवण्याचे आवाहनही केले.
हेही वाचा – ‘अदानी एअरलाइन’ येणार? इंडिगो आणि एअर इंडियाच्या चिंतेवर अदानी समूहाने केला मोठा खुलासा!
यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात पोहोचले, ज्याठिकाणी त्यांनी सोनम वांगचुक यांना सरकारतर्फे आश्वासनाचे पत्र सुपूर्द केले. दोन्ही मंत्र्यांनी असेही सांगितले की, “सरकार उद्या एका तटस्थ ठिकाणी औपचारिक चर्चेसाठी सरन्यायाधीशांच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करून संवाद प्रक्रिया पुढे नेईल.”
प्राप्त माहितीनुसार, चर्चेदरम्यान सरकारने वांगचुक यांना आश्वासन दिले की, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागांतर्गत (DoPT) तयार केलेले एक नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केले जाईल. या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सोनम वांगचुक यांनीही सरकारला कळवले की त्यांना लवकरच लडाखला परतायचे आहे. तथापि, त्यांनी सांगितले की परतण्यापूर्वी ते आंदोलनाशी संबंधित विद्यार्थी आणि समर्थकांना भेटतील. सूत्रांनुसार, वांगचुक विद्यार्थ्यांना सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतील. ते आंदोलकांना शांततेने आंदोलन सुरू ठेवण्याचे आणि कोणत्याही समाजकंटकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करतील, जेणेकरून आंदोलनाच्या मूळ भावनेला धक्का लागणार नाही.
वांगचुक यांनी सरकारला आश्वासन दिले की ते शांततापूर्ण संवाद आणि रचनात्मक वाटाघाटींना पाठिंबा देत राहतील आणि आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले, जेणेकरून संवादातून तोडगा काढता येईल.





