पहिले अर्धशतक कुटुंबाला समर्पित; वैभव सूर्यवंशीची भावनिक प्रतिक्रिया

Vaibhav Sooryavanshi : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. आता या मालिकेतील पहिला सामना काल पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचे रौद्र रुप पाहायला मिळाले. मागील काही सामने त्याच्यासाठी अवघड गेले पण आता त्याने पुन्हा कमबॅक केला आहे. हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या 13.2 षटकांत 126 धावांचे लक्ष्य पूर्ण करत सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. यात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याच्या फलंदाजीच्या पराक्रमाची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या सामन्यात वैभवने अवघ्या 18 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकल्या आणि वयाच्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर वैभवने आपल्या अर्धशतकाबद्दल एक विधान केले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी-20 सामना संपल्यानंतर बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. वैभव सूर्यवंशीने रिंकू सिंगशी आपल्या शानदार खेळीबद्दल बोलताना सांगितले, “माझा पहिला सेलिब्रेशन माझ्या वडिलांसाठी होता. दुसरे सेलिब्रेशन हे मी हे माझ्या आईसाठी केले, आणि याबद्दल मी आणि रिंकू भैय्या यांनी चर्चा केली होती. मला हे माझ्या कुटुंबाला, माझ्या प्रशिक्षकांना आणि माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या, चांगल्या आणि वाईट काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येकाला समर्पित करायचे आहे.”
हेही वाचा – रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरात होतात गंभीर बदल; काय सांगतो नवा अभ्यास?
आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर, वैभव सूर्यवंशी पहिल्या तीन सामन्यांमध्ये विशेष प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. परिणामी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तो सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. वैभवने व्हिडिओमध्ये असेही म्हटले, “मी कोणत्याच गोष्टीला हलक्यात घेत नाही. मी जिथे कुठे खेळतो, तिथे माझे सर्वोत्तम देण्याचा, संघासाठी योगदान देण्याचा आणि चांगली कामगिरी करत राहण्याचा प्रयत्न करतो.” हरारेच्या मैदानाबद्दल तो म्हणाला, “तुम्ही म्हणू शकता की मला इथले वातावरण आवडते. काही मैदाने अशी असतात जिथे धावा करणे मजेशीर वाटते, आणि कदाचित हे त्यापैकीच एक आहे.”





