मुंबईकरांनो सावध! पुढील तीन ते चार तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडल्यानाचा इशारा
तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या अनेक भागांत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने प्रवासात मोठी अडचण येत आहे. तसेच सायनमधील गांधी मार्केट आणि हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम असून, भांडुपमधील एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर परिसरातही पावसाचे पाणी साचले असून, पारसी कॉलनी आणि टीटी सर्कल भागात विशेषतः काळजी घेण्याची गरज आहे.
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आणि पावसाच्या काळजीपूर्वक तयारी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकल प्रवास करताना सुरक्षिततेचा विशेष विचार करण्याचेही सुचवले आहे.





