‘देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पणखा, शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय राहणार नाही’; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई | बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे कुठे होते? असा खोचक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पणखा, या शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात. ‘कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशी गर्जना उगाच दिली जात नाही. भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला, असं कुणाला म्हणताना ऐकलं आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली.
हेही वाचा – शरद पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले; म्हणाले..
बाबरी कोसळताना शिवसेना कुठे होती? हे पाहायचे असेल तर बाबरी पाडल्यानंतर विशेष न्यायालयाने आरोपी ठरविलेल्यांची नावे वाचा. देवेंद्र फडणवीस वकील आहेत, त्यांनी आरोपपत्र एकदा पाहावे. मग त्यात किती शिवसैनिक आहेत, हे महाराष्ट्राला सांगावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. रामाचे श्रेय तुम्हालाच घ्या. पण प्रभू श्रीराम तुम्हाला श्रेय घेऊ देईल का? हे २०२४ ला कळेल, असं संजय राऊत म्हणाले.
हजारो शिवसैनिक अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. दैनिक सामनावरच १५० खटले दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः लखनऊच्या सीबीआय न्यायालयात हजर झालेलो आहोत. मोरेश्वर सावे आणि अनेक आमदार, नगरसेवक त्यावेळी अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. आज भाजपासह असलेल्या शिंदे गटातील शेळ्या-मेंढ्या या त्यावेळेस तिथे नव्हत्या. देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत गेलेले असून ते अनेक मायावी रुपं धारण करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. २०२४ या शूर्पणखेचं नाकच कापू, असं संजय राऊत म्हणाले.





