कुलंग किल्ल्यावर अडकलेल्या १३ पर्यटकांची ७ तासानंतर सुटका
इगतपुरी – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भावली डॅमजवळ असलेल्या कुरुंगवाडी येथील किल्यावर फिरायला गेलेले १३ पर्यटक त्याठिकाणीच अडकून पडले होते. मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तब्बल ७ तास प्रयत्नांची शिकस्त करून या सर्वांची सुखरूप सुटका केली. किल्यावर अडकलेल्या पर्यटकांमध्ये ८ पुरुष, २ महिला आणि ३ बालकांचा समावेश होता. हे सर्व पर्यटक बडोदा येथील राहणारे आहेत.
हे सर्व पर्यटक काल रविवारी कुलंग किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. रात्रभर फिरताना ते रस्ता चुकले आणि तिथेच अडकले. सुदैवाने त्यावेळी मोबाईल नेटवर्क असल्याने त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला फोन केला. त्यामुळे तत्काळ हे पथकही गडाकडे रवाना झाले आणि केवळ मोबाईल नेटवर्क असल्याने सतत त्यांच्या संपर्कात राहून पथकाने या सर्वांना अखेर ७ तासांची शोध आणि सुटका मोहीम राबवत दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास किल्ल्यावरून सुखरूप खाली आणले. या किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची नावे – आकाश कसोरे, विजय सोलंकी, माधवी वामतोरे, प्रभू प्रसाद, ग्लिम्स रॉयल, स्टेलोन क्रिस्टी, नीता मिश्रा, न्यास मिश्रा, चिलसी परमार, रेक्स मास्टर, प्रमोद अँडरसन आणि जोशीन देवेन अशी असल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.