दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात, बोर्डाची जय्यत तयारी!
पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात होत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन ही परीक्षा होणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही प्रवेशपत्र शाळेत संपर्क करुन किंवा वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येतील. विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असल्याशिवाय त्यांना दहावीच्या परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दहावीचे पेपर सुरु होण्यापूर्वी 30 मिनिटे परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे.
बोर्डानं जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणं ही परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाईल. पहिल्या सत्रातील परीक्षा 10.30 ते दुपारी 2 पर्यंत होईल. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 5.15 वाजता होईल. कोरोना संसर्ग लक्षात घेता परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. यावेळी 21 हजार 341 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, बारावीसाठी 2943 परीक्षा केंद्रावर परीक्षेचं आयोजन करण्यात येत होतं. मात्र, यावेळी 9613 परीक्षा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल फोन, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.