२०१८ मध्ये शरीफांचा अस्त, इम्रान खान सत्तेवर, पाकमध्ये या वर्षभरात काय घडले
पाकिस्तानने २०१८ मध्ये पीएमएल-एन आणि पीपीपीचे वर्चस्व मोडून क्रिकेटच्या दुनियेतून राजकारणात आलेल्या इम्रान खान यांचा राज्याभिषेक पाहिला. इम्रान खान यांनी पंतप्रधान झाल्यानंतर भारताशी संबंध सुधारण्याबाबत भाष्य करत कर्तारपूरचे दरवाजे भारतीय शिखांसाठी खुले केले. वर्ष २०१६ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक संबंधात निर्माण झालेला तणाव अजूनही कायम आहे. कर्तारपूरमध्ये भारतीयांना येण्यास परवानगी दिल्याने दोघांमधील संबंधात सुधारणा होण्याची शक्यता वाढली आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचे काम पुढील वर्षी गुरूनानक देव यांच्या ५५० व्या जयंतीपूर्वी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी यासंबंधी म्हटले की, दोन्ही देशांमध्ये संबंध निर्माण करण्यासाठी कर्तारपूर हा एकमेव प्रयत्न नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी सप्टेंबरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काश्मीरसह सर्व मुद्यांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक भारताने रद्द केली केली. त्यामुळे आमच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.
संरक्षण तज्ज्ञ तलत मसूद म्हणाले की, कर्तारपूर कॉरिडॉर हा दोन्ही देशांच्या सुसंवादासाठीचा एक चांगला पुल आहे. या माध्यमातून सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे. पाकिस्तानने भारताचा नागरिक हामिद निहाल अन्सारीला ६ वर्षांनंतर मुक्त केले. पण देहदंडाच्या शिक्षेचा सामना करत असलेल्या कुलभूषण जाधव बाबत मात्र त्यांचा पूर्वीचाच पवित्रा कायम आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफला सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी इम्रान यांची भेट घेऊन भारतीय संघाच्या हस्ताक्षर असलेली बॅट त्यांना भेट दिली. इम्रान यांचे निकटवर्तीय आरिफ अल्वी हे पाकचे नवे राष्ट्रपती झाले.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले की, काश्मीरसह सर्व मुद्यांवर भारताबरोबर सुयोग्य चर्चा करण्याचे पाकिस्तान समर्थन करते. परंतु, भारताने दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी चालणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत खान म्हणाले की, २००८ मध्ये मुंबई हल्ला हा दहशतवादी हल्ला होता. मुंबई हल्लेखोरांबाबतही आम्ही काही करू इच्छितो. हे प्रकरण संपुष्टात आणणे हे आमच्या हितासाठी चांगले आहे, कारण तो दहशतवादी हल्ला होता.
आर्थिक संकटाचा सामना
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ८ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत मागितली आहे. बाहेरून आर्थिक मदत मिळवण्यासाठी ते सौदी अरेबिया आणि चीनलाही गेले होते. दोन्ही देशांनी त्यांना ६ अब्ज अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेमधील संबंध २०१८ मध्ये आणखी बिघडले. अमेरिकेकडून पाकला देण्यात येणारी ३० कोटी अमेरिकन डॉलरची सैन्य मदत रोखली आहे.
नवाझ शरीफांसाठी दुर्दैवी
देशातील सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी शरीफ यांच्यासाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने त्यांनी १० वर्षांची व ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या मुलीला ७ वर्षे तर जावई कॅप्टन सफदरला १ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर्षी नवाझ यांच्या पत्नी कुलसूम यांचे लंडन येथे दीर्घ आजाराने निधन झाले. नवाझ यांचे छोटे भाऊ शाहबाज यांनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्यांनाही भ्रष्टाचारप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
आसिया बिबी निर्दोष
ख्रिश्चन महिला आसिया बिबीला ८ वर्षांपर्यंत शिक्षेचा सामना करावा लागला. पण नंतर ईशनिंदाप्रकरणातून तिला निर्दोष ठरवण्यात आले. मात्र, कट्टरपंथीयांमुळे तिची मुक्तता करण्यात आलेली नाही. याचवर्षी मानवाधिकार कार्यकर्ते आस्मा जहाँगीर यांचे निधन झाले.