हे सरकार शेतकरी विरोधी, कंगाल आणि दारुड्यासारखे : प्रकाश आंबेडकर
मुंबई | या देशातील केंद्र सरकार हे कंगाल आणि दारुड्या सारखे सरकार आहे. तर RSS हे देशातील आतंकवादी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद निकालावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या निकालाने समाधानी आहे. लोकांची कामं केली म्हणून आम्हाला अकोल्यात सत्ता दिली. तसेच काही जिल्हा परिषदांमध्ये आमचे सदस्य निवडून आले आहेत.
या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्राचे सरकार हे कंगाल आणि दारुडे सरकार अशी अवस्था आहे. सरकारी तिजोरी खाली झाली आहे. ही गोष्ट सरकार लपवत आहे. शासन चालविण्यासाठी 13 लाख कोटी सरासरी लागतील असा अंदाज आहे. नवीन बजेट येईपर्यंत उरलेली रक्कम जमेल का अशी शंका आहे. शासन चालविण्यासाठी पैसे कुठून येणार ? असा सवाल त्यांनी केला आहे. 12 लाख कोटींची तूट केंद्र सरकारला पडणार आहे. दारूडा जसा घरातील वस्तू विकतो, तसं हे सरकार मालमत्ता विकत आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच विकण्याचा डाव आहे. असही आंबेडकर म्हणाले.