हुर्रियत सहमत असल्यास सरकार चर्चेस तयार – राजनाथ सिंह
मेहबुबा मुफ्तींनी केले वक्तव्याचे स्वागत
नवी दिल्ली – हुर्रियत कॉन्फरन्स ही विभाजनवादी संघटना सहमत असल्यास केंद्र सरकार चर्चेस तयार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज म्हटले. अर्थात, सरकारशी शांतता चर्चा करण्याबाबतचे कुठले संकेत अजून हुर्रियतकडून मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांना स्थगिती देण्याची घोषणा अलीकडेच केंद्र सरकारने केली. त्यापार्श्वभूमीवर, हुर्रियतबाबत राजनाथ यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. काश्मीरमधील सर्व घटकांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे मी याआधीच म्हटले आहे. चर्चेसाठी हुर्रियत पुढे आल्यास त्यांच्याशी बोलणी करण्यात आम्हाला गैर वाटणार नाही. सरकारचे विशेष प्रतिनिधी दिनेश्वर शर्मा आधीपासूूनच जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या विविध घटकांशी संवाद साधत आहेत, असे राजनाथ एका वाहिनीशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, राजनाथ यांच्या हुर्रियतबाबतच्या वक्तव्याचे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले. विभाजनवाद्यांनी प्रगल्भता दाखवून सरकारशी चर्चा करण्याची संधी दवडू नये, असे आवाहनही मेहबुबा यांनी केले. काश्मीला वादग्रस्त भाग म्हणून जाहीर करावे. तसेच, पाकिस्तानला चर्चेत सहभागी करून घ्यावे, या मागण्यांवर विभाजनवादी अडून राहिल्याने त्यांच्याबरोबरचे चर्चेचे याआधीचे प्रयत्न निष्फळ ठरले.