गुन्हा रद्द करण्याची आरे आंदोलकांची मागणी
- पोलिसांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप
मुंबई : ‘आम्ही शांतपणे वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी आरेमध्ये एकत्र आलो होतो. कोणतेही गुन्हेगारी कृत्य केलेले नाही, त्यामुळे आमच्यावरील गुन्हे रद्द करावे,’ अशी मागणी आरे प्रकरणातील २९ आंदोलकांनी गुरुवारी केली.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी महिला आंदोलकांना मारहाण केल्याचा गंभीर आरोपदेखील या वेळी करण्यात आला. जामिनावर सुटलेल्या २९ आंदोलकांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. शुक्रवारी उच्च न्यायालयात ‘मेट्रो ३’च्या कारशेड जागेवरील झाडे तोडण्या विरोधातील याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर रात्रीच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वृक्षतोडीस सुरुवात केली. त्या विरोधात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यावरणप्रेमी आरेमध्ये जमा झाले होते. त्या वेळी अनेकांना ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी सोडून देण्यात आले, पण २९ आंदोलकांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. शनिवारी या सर्वाना जामीन मिळाला.
आंदोलनादरम्यान पोलिसांचा ताफा इतका प्रचंड होता की, आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला करणे शक्यच नव्हते असे अनेक आंदोलकांनी या वेळी सांगितले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याने तो हटवावा अशी मागणी करण्यात आली. वृक्षतोडीस विरोध सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रात्री कारशेडकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर रोधक लावले होते. तेथून निघून जाण्यास सांगितले तरी जाणे शक्य नव्हते आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येकालाच पोलीस ताब्यात घेत असल्याची माहिती या वेळी आंदोलकांनी दिली. कारशेड परिसरात मोबाइल नेटवर्क रोधक बसविल्यामुळे संपर्कात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी या वेळी सांगितले.