खुशखबर! बारावीच्या गुणपत्रिकेवरूनही आता नापासचा शेरा हटणार; जीआर जारी, यंदापासूनच होणार बदल
मुंबई | महाईन्यूज
दहावीनंतर आता बारावी परीक्षेतही नापास िवद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून नापासचा शेरा हटणार आहे. त्याऐवजी ‘पुरवणी परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा मिळेल. पुरवणी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाईल. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासनादेश गुरुवारी जारी केला. यंदापासूनच गुणपत्रिकेत हा बदल केला जाईल. दहावी विद्यार्थ्यांना २०१६ पासूनच गुणपत्रिकेवर नापासचा शेरा देण्याचे बंद झाले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाने दहावी आणि बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
नापासऐवजी कौशल्य विकासास पात्र असा शेरा देण्याचा जीआर जारी केला होता. त्याच जीआर आधारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवा शासनादेश जारी केला आहे. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च २०२० मध्ये बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करण्यात येत अाहे. एखादा विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयांत नापास किंवा श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत नापास असल्यास पुरवणी परीक्षेस पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. जुलै-ऑगस्ट २०२० च्या पुरवणी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही गुणपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात श्रेणी विषयासह नापास असल्यास पुरवणी परीक्षेस पात्र असा शेरा गुणपत्रिकेत दिला जाणार आहे. श्रेणी विषयासह तीन किंवा ३ पेक्षा अधिक विषयात नापास असल्यास त्याला कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र शेरा दिला जाईल.