शहरात हिवताप, डेंग्यु व चिकुनगुन्याची साथ, नागरिकांनो पालिकेच्या सूचनांचे पालन करा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
हिवताप हा आजार एनॉफिलस व डेंग्यु, चिकुनगुन्या हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभुत असतात. हिवताप, डेंग्यु किंवा चिकुनगुन्या झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप किंवा डेंग्यु चिकुनगुन्याचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात, असा विषाणुजन्य डास निरोगी माणसास चावल्यास त्याला हिवताप किंवा डेंग्यु चिकुनगुन्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हिवताप, डेंग्यु किंवा चिकुनगुन्या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागेल. त्यासाठी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासांची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंडयातुन बाहेर पडणा-या डासांच्या अळ्या त्याच पाण्यात वाढतात. ४-५ दिवसानंतर या अळयांचे कोष बनतात. व हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातुन २ दिवसांनी डास बाहेर पडतात. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते. आपण घरात पाण्याची साठवण करतो. तसेच, घराभोवतीच्या परीसरात साठलेले सांडपाणी असे साठलेले पाणी डासांच्या वाढीस उपयुक्त असते. साठलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या वाढल्या तरी आपण त्याकडे विशेष लक्ष देत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती विनासायास होते.
डासांच्या अंड्यापासुन त्याचा डास होण्यास 08-10 दिवसांचा कालावधी लागतो, म्हणुन आपण जर दर आठवड्यास साठलेले पाणी एकदा पुर्णपणे वापरुन ड्रम कोरडा केला, सुकवून नंतर परत भरला तर त्या पाण्यात असलेल्या पण नजरेस न दिसणा-या अंडी व अळ्या मारल्या जातील. तसेच, घराभोवतीच्या साठलेल्या पाण्याची डबकी बुजविली किंवा साठलेले पाणी वाहते केले तर डासांच्या उत्पत्तीस आळा बसेल. आपल्या घरातील पाण्याचे काही साठे असे पुर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. उदा- घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा फ्लॅटच्या तळघरात असलेली साठलेले पाणी अशा ठिकाणी डासांनी अडीच घालु नयेत, म्हणुन या टाक्या पुर्णपणे झाकण टाकुन बंद ठेवाव्यात म्हणजे डास टाकीत शिरु शकणार नाहीत.
आपल्या घरामध्ये आपल्याकडुन दुर्लक्षित असणारे साठलेले पाणी फलॉवर पॉट, कुलर, मनीप्लॅन्ट, घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी असते. दर आठवड्यास या वस्तुतील पाणी बदलले गेले नाही, तर डासांना अंडी घालण्यास उत्तम जागा मिळते. पावसाळयात घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर आपण टाकलेल्या भंगार मालात पाणी साचते. हे पाणी फेकुन देण्याचे आपल्या लक्षातही येत नाही. पाऊस गेल्यावर उन्हामुळे या वस्तु आपोआप वाळतील अशा दृष्टिने आपण त्याकडे पाहातही नाही. पण, याच पाण्यात डासांची भरपुर वाढ होऊ शकते . हिवताप व डेंग्यु चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार वाडू नये म्हणुन डास उत्पत्तीवर नियंत्रण घेण्यासाठी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.
घरात पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यातील पाणी वापरुन रिकामी करुन कोरडी करावयाची आहेत. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावयाचे आहे. घरातील मोठ्या टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत, त्यांना घट्ट झाकण बसवायचे आहे. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रे यामधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावयाचे आहे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावायची आहे. घराभोवतीच्या पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा सदर ठिकाणे पाणी वाहते केले जाईल, याबाबत दक्षता घेण्यात यावी. येणा-या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरु नयेत, म्हणुन वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशा सूचना डॉ. साळवे यांनी केल्या आहेत.