‘हा’ फक्त एक फार्स ठरू नये; सतेज पाटील यांची टीका
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. याबरोबरच सरकारला मोठा दणका दिला आहे. कायद्यांना स्थगिती देण्यासोबतच न्यायालयाने 4 सदस्यीय समिती नेमली आहे. समितीमधील चारही सदस्य कृषी कायद्याचे समर्थन करणारे आहेत, असा आरोप केला जात आहे. सर्वाच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर याबाबत ट्विट करत काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टीका केली आहे.
तीन कृषी कायद्यांच्या बाजूने बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या या चार सदस्यांचा समावेश असणारी ही कमिटी आंदोलन थांबविण्यासाठी केलेला फक्त एक फार्स ठरू नये. सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी लढाई अजून संपलेली नाही, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. कमिटीने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून या निर्दयी मोदी सरकारला हे काळे कायदे रद्द करायला लावावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले.