हा गुरूजी समाजात गरळ ओकतोय, संभाजी भिडेंवर अजित पवारांची आगपाखड
पुणे – पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरु केली. मात्र त्याच भिडे आडनावाशी साधर्म्य असणारी एक व्यक्ती माझ्या बागेतील आंबे खाल्ल्यानं मुलगे होतात असं सांगतात.आपण जे बोललो त्याचा त्यांना खेदही नाही. पुन्हा एकदा महिलांना चूल आणि मूल यातच जुंपण्याचा डाव आहे की काय अशी शंका येते.अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडेच्या आंबा विधानाचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी अजित पवार म्हणाले की,संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ म्हटला जातो. समाजात काय पेरले जाते.याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून याला आपण एकजुटीने अशा मानसिकतेला विरोध करणे आवश्यक आहे. गुरुजींबदद्ल आम्हाला आदर असायचा. मात्र हा गुरुजी देशात गरळ ओकण्याचे काम करत आहे. अशा शब्दात संभाजी भिडेवर त्यांनी निशाणा साधला.
पुणे शहर राष्ट्रवादी पक्ष आणि चिंतामणी ज्ञानपीठ कडून यंदाच्या वर्षी सुचिता भिडे चाफेकर, विद्या बाळ,कीर्ती शिलेदार आणि प्रमिला संकला यांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी आमदार बापूसाहेब पठारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,कार्यक्रमाचे संयोजक अप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे आणि विशाल तांबे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे दहा वर्षे उर्जा खाते होते.तेव्हा लाईनमन बाबत अनेक तक्रारी यायच्या.की ते काम करीत नाही.दुसऱ्या काम सांगतात.त्या मागच कारण होत ते म्हणजे त्यांचं पोट सुटलेले. मग ते काय खांबावर चढणार असा प्रश्न मला पडला.तेव्हा मी लाईन वुमनची भरती सुरु केली.त्यानंतर लाईटच्या बाबत तक्रारी कमी झाल्या आहेत.त्यामुळे महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक जबाबदारीनं काम करतात.हे यातून स्पष्ट होते.याच कामातून नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया चांगले काम करीत आहे.अशी भावना व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, ज्या देशांनी महिलांचा सन्मान केला.ते देश पुढे गेले असून ज्या देशांनी महिलांचा सन्मान केला नाही.ते मागे राहिल्याचे सांगत प्रत्येकाने महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.