हिंमत असेल सरकार बरखास्त करुन निवडणुका घ्या – आमदार भारत भालके यांचे आव्हान
पुणे – हिंमत असल्यास सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, पाहू कोण निवडून येते. असे आव्हान पंढरपूर काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी दिले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावू नका तर तीन दिवसांचे अधिवेशन बोलवा असाही सल्ला त्यांनी दिला.
इंदापूरच्या प्रशासकीय भवनासमोर मराठा आरक्षणासाठी तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची भेट भारत भालके यांनी घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले.
काकासाहेब शिंदे या तरूणाचा जीव गेला त्यानंतर या आंदोलनाला आक्रमक स्वरूप आले. यावरही भारत भालके यांनी भाष्य केले. आरक्षणासाठी आता जीव जाऊ लागले आहेत तरीही सरकारला पर्वा नाही अशी टीका भालके यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक बोलावली आहे. मात्र सर्वपक्षीय बैठक बोलवण्यापेक्षा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा अशीही मागणी भारत भालके यांनी केली.