हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्या वडिलांचे निधन
मुंबई – टीम इंडियाचे शिलेदार हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचे वडील हिमांशू पांड्या यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या यांना सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतून माघार घेत घरी परतावे लागणार आहे. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मॅनेजमेंटने कृणाल पांड्याला बायो सिक्योर बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. कृणाल लवकरच घरी परतणार असून हार्दिक पांड्यादेखील 12.30 वाजेपर्यंत बडोद्यात दाखल होणार आहे.
वाचा :-जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाला सुरुवात, मोदींकडून मोहिमेला प्रारंभ
हार्दिक आणि कृणालच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे बडोदा क्रिकेटने याबाबत दुःख व्यक्त केलं आहे. हार्दिक आणि कृणालला क्रिकेटपटू बनवण्यात त्यांचे वडिल हिमांशू पांड्या यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती तरीदेखील एक-एक पैसा जोडून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीमध्ये धाडलं, आणि आता दोन्ही मुलं देशासाठी क्रिकेट खेळत आहेत.
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टंगडी याबाबत म्हणाले की, ”पांड्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन पांड्या कुटुंबाच्या दुखःत सहभागी आहे,”
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कृणाल पांड्याने 3 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर पहिल्या मॅचमध्ये 76 धावांची शानदार खेळी केली होती. कृणालच्या नेतृत्वात बडोद्याचा तिन्ही सामन्यात विजय झालेला आहे. बडोदा सी गटात आहे. या सी गटात बडोदा अव्वल क्रमांकावर आहे. दरम्यान हार्दिक पांड्या या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. हार्दिक इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी जोरदार सराव करतोय.