‘सुशांत सिंह प्रकरणातील साक्षीदारांच्या हत्या होऊ शकतात’, सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदाराचा दावा
मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे. त्यांची हत्या होऊ शकते, अशी अजब भीती सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदार नीरज सिंहने व्यक्त केली आहे. तसेच मुंबई पोलीस त्यांना सुरक्षा देण्यास नकार देत आहे, असा दावा केला. आमदार नीरज सिंह बबलू यांनी सुशांत प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याचाही दावा केला आहे.
भाजप नेते नीरज सिंह बबलू यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस साक्षीदारांना सुरक्षा देत नाही, असा दावा नीरज सिंह यांनी केला. तसेच साक्षीदारांच्या जीवाला धोका असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील या प्रकरणाची सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.
‘मुंबई पोलीस पुरावे नष्ट करु शकतात’, सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदाराचा दावा. नीरज सिंह यांनी मुंबई पोलीस सुशांत सिंह प्रकरणातील पुरावे नष्ट करु शकतात अशीही भीती व्यक्त केली आहे. तसेच सीबीआयने तातडीने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी केली आहे.