आषाढी वारीला पंढरपुरात नऊ दिवस संचारबंदी
पंढरपूर – यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरपूरात होणार्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 च्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात येणार आहे. 17 जुलै ते 25 जुलै अशी 9 दिवस ही संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणार नाही.
ही संचारबंदी पंढरपूर आणि आजूबाजूच्या दहा गावात लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आता शासनाने हिरवा कंदील दिला आहे. पंढरपूरात गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे चंद्रभागा नदीच्या परिसरात 144 कलमा अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना शासनाने परवानगी दिली आहे त्याच लोकांना पाच दिवस पंढरपूरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. दरम्यान, गेल्या वर्षी पंढरपूरात केवळ दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती.