सात वर्ष सहन केलं, दु:ख कधीच व्यक्त केलं नाही : धनंजय मुंडे
पुणे | “2014 साली मला कुणी चांगलं बोलत नव्हतं. मला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसलं, खलनायक म्हणायचे. माझी लायकी काढली गेली. पण जसजसे लोक माझं काम बघायला लागले धन्याचा धनंजय झाला, धनंजयचा धनू भाऊ झाला आणि आता धनू भाऊचा मंत्री महोदय झाला. शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीने सोबत असते. हे मी पाहिलं आणि अनुभवलं. गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं, या गोष्टीचं दुःख कधीच व्यक्त केलं नाही”, असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
पुण्यात स्थायिक झालेल्या परळीच्या नागरिकांनी पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (20 जानेवारी) आभार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना धनंजय मुंडे भावूक झाले. “2014 च्या काळात धनंजय मुंडे जसा आला, लोकांनी आणि माध्यमांनी जे मांडलं तसं तुमचं मत झालं. यात मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. ते माझ्या नशिबात होतं, ते मी भोगलं. शेवटी स्वकर्तृत्वाने मिळालेलं कायम राहतं, अलगद मिळालेलं टिकत नाही”, असं धनंजय मुंडे म्हणाले.