breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पावसाचा हाहाकार, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

सांगली – मुसळधार पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गुरुवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. धरणाच्या दरवाजांमधून तीन हजार क्युसेक, तर वीज निर्मिती गृहातून १४०० असा एकूण ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. विसर्ग सुरू झाल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सांगलीत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर गेलाय. धरणात २२ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पाटबंधारे विभागाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी दुपारी तीन वाजता पाटबंधारे कार्यालयाचे सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर, शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांच्या हस्ते पाणी पूजन करून पाण्याचा विसर्ग सुरू केला. धरणाच्या पायथागृहातील वीज निर्मिती सुरू झाली आहे. वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक आणि मुख्य वक्राकार दरवाजातून ३००० क्युसेक असा एकूण ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

धरणातून विसर्ग सुरू झाल्याने वारणा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणातील विसर्गामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात तैनात आहेत. यातील एक पथक सांगली शहरात, तर दुसरे पथक आष्टा येथे आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत सांगलीत कृष्णा नदीची पातळी २३ फुटांवर होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button