breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘ईएसआय’ योजनांपासून एमआयडीसीतील कामगार वंचित
– ईएसआय रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील विमा कामगार राज्य कामगार विमा योजनांपासून वंचित राहिला आहे. कामगार रुग्णालयात पुरेशी सुविधा नसल्याने रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहे. त्यानंतर कामगारांना येणारा खर्च मिळणे अपेक्षित आहे. मात्र, हा खर्च मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे विमा कामगारांसाठी असणारी ही योजना ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
राज्य सरकारच्या योजना विभागाकडून कामगारांसाठी विमा योजना राबवली जाते. कामगारांच्या पगारातून 1. 75 टक्के व संबंधित कंपनीकडून 4. 75 टक्के असे एकूण 5. 5 टक्के रक्कम कपात केली जाते. सरकारच्या या विभागाला वर्षाकाठी 13 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र, त्याचा कामगारांना कोणताच लाभ होताना दिसत नाही. कामगारांसाठी वैद्यकीय सुविधादेखील पुरेशा मिळत नाहीत. कामगारांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, म्हणून विमा रुग्णालय सुरू करण्यात आले आहेत. चिंचवड व नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार मिळणे अपेक्षित आहे. मात्र, या दोन्ही रुग्णालयात पुरेशी सुविधा मिळत नाही. डायलेसिस, उच्च तपासणी यंत्रणा, अत्याधुनिक प्रकारची प्रयोगशाळा उपलब्ध नाही. या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
कामगार रुग्णालयात रुग्णांना बाहेरून औषधे आणायला सांगितली जात आहेत. ही औषधे मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसतात. कामगार रुग्णालय नसलेल्या परिसरातील कामगार खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. या ठिकाणी हजारो रुपये उपचारासाठी खर्च येत आहे. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना रक्कम मिळणे अपेक्षित असते. मात्र, कागदपत्रांची जुळवाजुळवी करताना कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘ईएसआय’ची रक्कम कधी मिळणार? असा सवाल कामगार करत आहेत.