breaking-newsराष्ट्रिय
सरन्यायाधिश मिश्रा विशिष्ट परिस्थितीचे बळी
- सुप्रिम कोर्ट बार असोच्या अध्यक्षांचे प्रतिपादन
नवी दिल्ली- निवृत्त सरन्यायाधिश न्या दीपक मिश्रा हे विशिष्ट परिस्थितीचे बळी ठरले आणि त्यांच्या या स्थितीचा वापर करून सर्वोच्च न्यायालय या संस्थेची मानहानी करण्याचा प्रकार घडला आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालय बार असोशिएशनचे अध्यक्ष विकास सिंग यांनी म्हटले आहे. मावळत्या सरन्यायाधिशांना बार असोसिएशनच्यावतीने निरोप देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. न्या मिश्रा यांच्यावर ओढवलेली स्थिती दुर्देवी होती असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
न्या मिश्रा यांच्याविषयीच्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर या न्यायालयाच्या बारने न्याय संस्थेच्या बाजूने उभे राहण्याची गरज होती पण आमच्यातल्याच काहींनी या विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेत न्याय व्यवस्थेलाच दूषणे देण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. त्यावेळी सर्वोैच्च न्यायालयाच्या बारने या प्रकरणात उडी घेत सरन्यायाधिशांची बाजू घेतली. जर बारने अशी बाजू घेतली नसती तर सर्वोच्च न्यायालय या व्यवस्थेची न भरून येणारी हानी झाली असती असेही त्यांनी नमूद केले. सुप्रिम कोर्टाच्या बारने न्या मिश्रा यांची बाजू घेऊ नये म्हणून आमच्यावर अनेक ठिकाणाहून दबाव आला होता असेही त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले.