सरकार शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा करण्यास तयार : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेली अडीच महिन्यापासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेकदा चर्चा होऊ देखील कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. शेकऱ्यांकडून कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली आणि देशव्यापी चक्का जाम देखील करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
पीयूष गोयल म्हणाले की, शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्यास सरकार तयार आहे; मात्र वारंवार प्रस्ताव दिल्यानंतरही आंदोलक अजूनपर्यंत कुठलेही ‘ठोस प्रस्ताव’ घेऊन पुढे आलेले नाहीत.
हे सरकार शेतकऱ्यांच्या मुद्यांबाबत संवेदनशील आहे. पंतप्रधान व सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. काही शब्द बदलून कायदे आणखी कठोर करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. हे कायदे १८ महिन्यांसाठी स्थगित करण्याचाही प्रस्ताव आम्ही दिला, असेही गोयल म्हणाले.
दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला असून, पीयूष गोयल हे मुंबईतील आहेत. ते आमचे मित्र आहेत. परंतु पीयूष गोयल आणि शेती यामधलं मला माहिती नाही. पीयूष गोयल हे शेतीतज्ज्ञ आहेत हे ऐकून माझ्या ज्ञानात नवी भर पडली, असा टोला पवारांनी लगावला आहे.