सरकारने संभाजी भिंडेना महाराष्ट्र भूषण अथवा भारतरत्न पुरस्कार द्यावा
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची उपरोधिक टीका
शिर्डी – संभाजी भिडेंवर सरकारचा विशेष स्नेह वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना थेट महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विखे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भिडे यांच्याविरूद्धचे काही गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे भिडे यांना सरकारचे पाठबळ असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप खरा ठरला आहे.
भिडे यांना मुळात संविधानाप्रती आदर नाही. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीपासून प्रेरणा घेऊन संविधान लिहिले, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या लेखी ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांपेक्षा मनू मोठा होता. आंबे खाऊन मूल होण्यासंदर्भात नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात समन्स बजावल्यानंतरही भिडे न्यायालयात उपस्थित रहात नाही. त्यासाठी समन्स पोहोचलेच नसल्याची सबब सांगितली जाते. पण असे समन्स निघाल्याचे वर्तमानपत्रांनी प्रकाशित केल्यानंतरही भिडे त्याची दखल घेत नाही. न्यायालयात उपस्थित राहून कायद्याप्रती आदर दाखवू शकत नाही. त्यांच्यावरी गुन्हे मागे घेऊन सरकार नेमका काय संदेश देते आहे? अशी संतप्त विचारणाही विखे यांनी केली.