पंतप्रधान ‘जन की बात’ ऐकतच नाहीत
नगर -राज्याच्या काही भागात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काळात पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत राज्याच्या प्रमुखाला ही परिस्थिती हाताळायची कशी, याचीही माहिती नाही. केंद्रातील सरकारनेही शेतकर्यांऐवजी उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी 81 हजार कोटी दिले. त्यामुळे भाजप सरकार केवळ शहरी भागाचाच विचार करण्यापुरतेच मर्यादित असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दरम्यान, देशाचे पंतप्रधान ‘मन की बात’ ऐकवतात, ‘जन की बात’ ते ऐकतच नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
नगर येथील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते बोलत होतो. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संग्राम कोते, माजीमंत्री मधुकरराव पिचड, दिलीप वळसे पाटील, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आदी उपस्थित होते. शरद म्हणाले की, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांतही काही भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता, त्यांना याची कल्पनाही नसल्याचे दिसून आले. ज्यांना शेतकरी, पाणी, दुष्काळ या प्रश्नांची जाण नाही, त्यांचे प्रश्न हाताळता येत नाहीत, अशांना सत्तेत बसविले आहे. जनतेलाही आता याची जाणीव झाली असून, जनता आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे.