शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर ; पदयात्रा दिल्लीत रोखली
नवी दिल्ली – कर्जमाफी, उसाला योग्य दर आणि अन्य मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांना आज उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेजवळ रोखण्यात आले. गाजीपूर सीमेजवळ पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार धुमचक्री झाली.
शेतकऱ्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि पाण्याचे फवार मारले. तसेच अश्रुधूरांचा मारा करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बळाचा वापर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेटस लावण्यात आले होते. हे बॅरिकेटस शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने ढकलण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि पाण्याचा वापर केला.
शेतकऱ्यांचा पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर यमुनापार भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातून दिल्लीला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. विविध मागण्यांसाठी किसान क्रांती पदयात्रा २३ सप्टेंबरपासून हरिद्वार येथून निघाली होती. मात्र, या पदयात्रेला दिल्लीच्या सीमेजवळ रोखण्यात आले.