समाजनिर्मितीत तृतीयपंथीयांनाही स्थान
- सरसंघचालकांचे सकारात्मक विधान, संघाच्या भूमिकेवर मात्र मौन
नवी दिल्ली : काळानुसार ऐरणीवर येणाऱ्या विषयांवर संघ विचार करू शकतो, असे सांगत तृतीयपंथीयांच्या समाजातील स्थानाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचा थेट उल्लेख न करता सकारात्मक टिप्पणी केली. ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हे पुस्तक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांनी लिहिले आहे.
आत्तापर्यंत संघाने चर्चा केली नसली तरी प्राचीन इतिहासात काही व्यक्तींचा समाजनिर्मितीत समावेश होताच. महाभारतामध्ये या व्यक्ती (शिखंडी) महायुद्धात उतरल्या. रणांगणात उतरून त्यांनी स्वत:चे योगदान दिले. समाजातील त्यांचे स्थान मोठी समस्या नाही. त्यांच्याशी आपलेपणाने वागले तर हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. या विषयाला संघ हात लावेल वा लावणार नाही. कदाचित भविष्यात या विषयावर चर्चा करण्याची गरजही उरणार नाही, असे मत भागवत यांनी मांडले.