सध्या विद्यार्थी दहशतीत – प्रकाश आंबेडकर
पुणे – गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये विद्यार्थी वर्गाकडून मोठय़ा प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. तरुणांचा उठाव झाला तर त्यांना नियंत्रित करणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केले.
‘अघोषित आणीबाणी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात अॅड. आंबेडकर बोलत होते. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील आणि बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉमरेड विश्वास उटगी उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, निवडणुका जवळ आल्याने महाविद्यालये ही स्फोटांची केंद्र होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. तरुणांचा बळी देऊन फॅसिझम येण्याचा मार्ग सोपा करण्यात येत आहे. तरुणांच्या माध्यमातून होणाऱ्या या अंतर्गत स्फोटाला रोखायचे असेल तर आपण जागरुक राहणे गरजेचे असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. न्यायमूर्ती सावंत म्हणाले,की भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय अवतार आहे. सामाजिक नीतिमूल्य पायदळी तुडवून देशात व्यापारी नीतिमूल्य स्थापन करण्यात येत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे रुपांतर धनिकशाहीत होत आहे. न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले, की नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्याची क्षमता देशाकडे आहे. मात्र ही ताकद मुठभर लोकांच्या हाती गेली आहे. मोदी-शहांच्या राज्यात निरपराध लोकच सुरक्षित नसल्याचेही ते म्हणाले.