सत्ताधारी भाजपकडे व्हिजन नसल्यामुळे कच-याचा प्रश्न गंभीर – अजित पवार
- नियोजनाचा अभाव असल्यामुळे समस्या गंभीर
- इच्छाशक्ती नसल्यामुळे नागरिकांचे होतायत हाल
पिंपरी, (महाईन्यूज) – सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांकडे कोणत्याही प्रकारच्या कामाचे नियोजन नाही. त्यांना शहरातील साधा कच-याचा प्रश्न सोडविता आला नाही. भविष्याचे व्हिजन नसल्यामुळे भरकटल्यासारखी सत्ताधा-यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक भाजप पदाधिका-यांच्या चुकीच्या कामकाजावर सडकून टिका केली.
पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सडेतोड टिका केली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक विठ्ठल काटे, मोरेश्वर भोंडवे, वैशाली घोडेकर, मयूर कलाटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राहूल भोसले, समीर मासुळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहराच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करत होतो. त्यामुळे नागरिकांचे दैनंदीन प्रश्न काय असतात, याची जाण होती. हे प्रश्न तातडीने सोडवून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात होते. भाजप सत्ताधा-यांकडे ते व्हिजन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार केला जात नाही. साधा कच-याचा प्रश्न देखील वेळेत सोडविला जात नाही.
गुन्हेगारांना ठेचून काढा
कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. दिवसाढवळ्या पदाधिका-यांवर हल्ले करण्याचा कट रचला जात आहे. विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना दत्ता साने यांच्यावर देखील भ्याड हल्ला झाला. वाहनांची तोडफोड केली जात आहे. वाहनचोरी वाढली आहे. समाजकंटकांकडून विनाकारण दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारी वाढली असून स्वतंत्र आयुक्तालय असताना ही गुन्हेगारी आटोक्यात आली पाहिजे. याबाबत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सत्तेचा गैरवापर खपवून घेणार नाही
पिंपरी-चिंचवड शहराचे गेली अनेक वर्षे आम्ही प्रतिनिधीत्व केले आहे. शहरात जातीय तेढ बाजुला सारून सर्वधर्मिंयांमध्ये सलोख्याचे वातावरण कायम टिकले पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहिले तर शांतता नांदणार आहे. त्यासाठी आमचे पोलिसांना कायमच सहकार्य आहे. आम्ही विरोधाला विरोध कदापी करणार नाही. परंतु, वेगळा विचार करत सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे, त्यांना संपवण्याचे कारस्तान सत्ताधारी भाजप करत आहे. हे कदापी खपवून घेणार नाही. हे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना स्पष्ट सांगितल्याचेही पवार यांनी सांगितले.