संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापुरात अश्वरिंगण
बारामती – जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे अश्वरिंगण इंदापूरच्या प्रांगणात सोमवारी पार पडले. त्यापूर्वी वारकऱ्यांचे रिंगण पार पडले. इंदापूरमध्ये पावसाच्या सरींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. नेत्रदीपक ठरलेला हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकाराममहाराजांची पालखी सोमवारी निमगाव केतकीचा मुक्काम आटोपून इंदापूरच्या दिशेने निघाली अन् टाळमृदंगाच्या निनादात विठुनामाचा जयघोष सुरू झाला. लाखो वैष्णव सोहळ्यामध्ये मार्गस्थ झाले.अनेक दिवसांपासून रुसलेला पाऊस आज मनसोक्त बरसला. विठूच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर निघालेले वारकरी भक्तिरसाबरोबरच या जलधारांमध्ये चिंब झाले. सगळीकडे धोधो बरसणारा तो पाऊस या भागात मात्र काहीसा रुसला होता. तुकोबांच्या पालखीसोहळा स्वागतासाठी जो जसा परतला, तसा शेतकºयांचा आनंददेखील द्विगुणित झाला.
सकाळी ११च्या सुमारास सोहळा इंदापूरमध्ये विसावला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पालखीचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पादुका दर्शनासाठी ठेवून गोल रिंगणाला सुरुवात झाली. या वेळी मनोºयाचे प्रात्यक्षिक झाले. नंतर पताकावाले, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, हांडेकरी, टाळकरी यांचे रिंगण पार पडले. वय विसरून धावताना सर्व जण ज्ञानबा-तुकाराम, विठोबा-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले होते. त्यानंतर मानाचे अश्व धावले. या वेळी पुन्हा ज्ञानबा-तुकारामचा जयघोष दुमदुमला. घोड्यांच्या टापांखालची रज भाळी लावण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.