संतपीठाची जागा ताब्यात घेण्यास आमदार लांडगे अपयशी – दत्ता साने यांचा आरोप
– संतपीठाची मूळ संकल्पना आमचीय, त्यांचे श्रेय घेवून आमदार महेश लांडगेंनी राजकारण करु नये
– संतपीठ निविदा प्रक्रियेतील रिंग दडविण्यासाठी सत्ताधा-यांचे कटकारस्थान महासभेत उघड करणार
– भाजपचे लोक देवाच्या कामात देखील लोणी खावू लागले
पिंपरी ( महा ई न्यूज ) – टाळगाव चिखलीतील संतपीठाची मूळ संकल्पना आमची आहे. संतपीठ उभारणीसाठी अजित पवारांच्या माध्यमातून शैक्षणिक आरक्षणाची काही जागाही आम्ही ताब्यात घेतली. सत्ताधारी भाजपच्या काळात संतपीठ उभारणीच्या निविदा प्रक्रियेत रिंग झाली असून त्या ठेकेदारांची रिंग दडपण्यात येत आहे. याकरिता भाजपची मंडळी संतपीठाच्या श्रेयाचे राजकारण करण्याचा पराक्रम करीत आहेत. परंतू, संतपीठाच्या रिंगचे कटकारस्थान महासभेत आॅडीओ क्लिपसह सादर करणार आहे. तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना संतपीठाची उर्वरीत जागा ताब्यात घेण्यास आमदार महेश लांडगे अपयशी ठरले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर उपस्थित होत्या.
साने म्हणाले की, भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा, वारकरी सांप्रदयाचे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, याकरिता जागतिक दर्जाचे संतपीठ टाळगाव चिखलीत उभारण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकाळापासून आम्ही पाठपुरावा करुन काही जागा ताब्यात घेतली. अद्यापही उर्वरीत एक हेक्टर 06 आर जागा ताब्यात घेतलेली नाही. सत्ताधारी भाजप संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत रिंग केलेली आहे. सदरील रिंग दडपण्यासाठी काही मंडळी श्रेयाचे राजकारण करु लागली आहे.
संतपीठाच्या विषयात आम्ही राजकारण करणार नाही. कारण, गावक-यांच्या मागणीनुसार त्यांची संकल्पना आम्ही मांडली होती. त्यामुळे संतपीठाचे श्रेय कोणी घेवू नये, त्यात राजकारणही करु नये. तसेच संतपीठाच्या एसव्हीपी कंपनीत महापालिकेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक वारकरी साप्रंदाय ज्येष्ठांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्या समितीत केवळ प्रशासकीय लोकांचा सहभाग करुन आयुक्तांनी प्रशासन राज आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
भाजप मागील दोन वर्षात काहीचे कामे केलेली नाहीत. त्यामुळे संतपीठाचे राजकारण करुन ही मंडळी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे संतपीठ हे वारक-यांचे ज्ञानपीठ असून त्यात देखील निविदा प्रक्रियेत रिंग केल्याने हे लोक देवांच्या कामात देखील लोणी खावू लागल्याची घणाघाती टिका साने यांनी यावेळी केली.