त्यांना सगळं दिलं तरी एकही ‘मायका का लाल’ सोबत थांबला नाही – अजित पवार
मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम
भाजपची सत्ता येताच हावशे-नवशे पक्ष सोडून गेले. आता सरकार आले म्हणून चिकटायला आले तर त्यांना जवळ करु नका. अशा लोकांना 2 वर्ष थांबायला सांगा ते खरंच पक्षासोबत आहेत का ते पाहा मग त्यांना जवळ करा”, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज मुंबईत ‘मिशन मुंबई 2022’ या शिबिरचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचना दिल्या.
“सत्तेत आल्यावर पक्षात हवशे नवशे येतात. मात्र, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि नरेंद्र वर्मा सोडून आपल्याला जे सोडून गेले त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही. सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, संजय पाटील यांना सगळं दिलं तरी निघून गेले. सुभाष मयेकर अध्यक्षपद होतं तोपर्यंत आपल्यासोबत होते, मात्र आता कुठे गेले माहित नाही. सरकार आले म्हणून चिकटायला आले तर त्यांना जवळ करु नका. यापुढे अशा लोकांना 2 वर्ष थांबायला सांगा ते खरंच पक्षासोबत आहेत का पाहा मग त्यांना जवळ करा”, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“मुंबईत 36 पैकी 10 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत. मुंबईत केवळ 8 नगरसेवक आहेत. यापुढे 50 ते 60 जागांवर विजय मिळाला पाहिजे. काम करताना तुमच्याजवळ असलेल्या पदाचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी करा. पक्षाची बदनामी आणि पवार साहेबांची बदनामी होऊ देऊ नका”, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.