शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची मदत द्या – अजित पवार
मुंबई – राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहिती देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील शेतक-यांना तातडीने मदत करुन दिलासा देण्यात यावा अशी मागणी यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासाठी निवेदन दिले.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, ‘परतीच्या पवासाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज आणि वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. तसंच, द्राक्ष बागांसह इतर फळबागांचे आणि भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाखांची मदत द्यावी. पशुधन आणि घरांची पडझड झाली आहे त्याचे देखील तात्काळ पंचनामे करावे, रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतं मोफत द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.